4k समाचार
पनवेल दि.१२(वार्ताहर): पडघे गावाजवळून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणा-या कासाडी नदीत केमिकल टाकून विष प्रयोग करणा-यांवर कारवाई करा अशी तक्रार शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी केली आहे. त्या कासाडी नदीतील केमिकमुळे त्या भागातील काही गुरे आणि मासे मृत झाले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत

पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून कासाडी नदी वाहते.पूर्वी पांढरी शुभ्र दिसणारी नदी आता प्रदूषणाने काळवंडली आहे.आजूबाजूचे कारखाने आपला घनकचरा,सांडपाणी आणि रसायने या नदीत बिनधास्त टाकतात.पडघे गावातून ही नदी वाहते.या नदीला लागून काही कारखान्यांनी कच्चे कंपाऊंड टाकले आहे.

या ठिकाणी रसायन मिश्रीत वस्तू गोण्यांमध्ये भरून ठेवले आहेत.त्यामुळे तेथे एकप्रकारे गोदाम तयार झाले आहे.याच ठिकाणाहून हे रसायन शेजारीच असलेल्या कासाडी नदीत लपूनछपून टाकले जाते.हा प्रकार रोजचा असल्याने त्या ठिकाणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. हे केमिकल संपूर्ण नदीत पसरल्याने या भागात नदीचे पाणी पूर्ण प्रदूषित झाले आहे.

त्यामुळे मासे आणि इतर जनावरे,गुरे मृत्यूमुखी पडले आहेत.याबाबत शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी याठिकाणी छापा टाकला.पण रसायन टाकणारे हे तेथून पळून गेले.त्यामुळे अशा प्रदूषण करणा-या कारखाने आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करावी असे देखील त्यांचे म्हणणे आहे

