4kNews कामोठे दि
पनवेल, दि.२ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील नितळस ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा नालंदा ऑर्गनायझेशन, पुणे आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान सोहळा २०२६’ मध्ये ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान’ प्रदान करून गौरव करण्यात आला.

पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित झालेल्या या राज्यस्तरीय सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नितळस ग्रामपंचायतीत विकासाभिमुख कामे, लोकसहभागातून राबविण्यात आलेले उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सौ. निकिता पाटील यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. निकिता पाटील यांनी हा सन्मान ग्रामस्थांचा विश्वास, सहकार्य आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सन्मानाबद्दल परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सौ. निकिता पाटील यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सामाजिक आणि विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यासाठी हा सन्मान अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

