4kNews कामोठे दि. 13
कळंबोली : रस्त्यावर सापडलेली सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल व दीड हजार रुपये असलेली बॅग कळंबोली येथील अविनाश सदाशिव घोटणे यांनी प्रामाणिकपणे कळंबोली पोलीस ठाण्यात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.

१२ ऑगस्ट २०२६ रोजी अविनाश घोटणे यांना कळंबोली परिसरातील रस्त्यावर एक बॅग सापडली. बॅगमध्ये दोन मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत तीन लाख रुपये आहे, तसेच दीड हजार रुपयांची रोकड होती. घोटणे यांनी कोणताही विलंब न करता सदर बॅग कळंबोली पोलीस ठाण्यात आणून जमा केली.

दरम्यान, कामोठे येथील रहिवासी शर्वरी शशिकांत सावंत या व्यंकट हॉटेल, कामोठे समोरील रस्त्यावर आपली बॅग हरवल्याने घाबरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. त्याचवेळी कळंबोली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल क्रमांक ३ वरील पोलीस हवालदार सुनिल ढाकणे व पोलीस शिपाई शेखर तांबे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना शर्वरी सावंत भेटल्या. त्यांनी पोलिसांना बॅग हरवल्याची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी त्यांच्या हरवलेल्या मोबाईलवर संपर्क साधला असता बॅग कळंबोली पोलीस ठाण्यात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बॅगची खात्री करून ती त्यांच्याकडे सुपूर्द केली. बॅगमधील दोन्ही मोबाईल व रोकडही सुरक्षितपणे परत करण्यात आली.
बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन करणारे अविनाश घोटणे यांचा कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करताना समाजातील प्रत्येकाने अशा आदर्शातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
घोटणे यांच्या प्रामाणिकपणामुळे महिलेची मौल्यवान वस्तू आणि रोकड सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्यांच्या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

