पनवेल, दि.23 (4kNews) ः बडोदा मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दुसर्या बोगद्याचे खोदकाम आरपार झाल्याची माहिती मिळत असून सध्या या मार्गावर युद्धपातळीवर रस्त्याचे बांधकाम सुरु असून जुलै 2025 पर्यंत हे काम पुर्ण करण्याच्या जोरदार हालचाली प्राधिकरणाकडून सूरु आहेत. या दुहेरी बोगद्यामुळे आणि प्रशस्त महामार्गामुळे काही मिनिटांत बदलापूर येथील नागरिकांना पनवेल, उरण जेएनपीटी बंदरामध्ये आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापर्यंत पोहचता येणार आहे.
सिडकोची दक्षिण नवी मुंबई म्हणजेच नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राला (नैना) थेट दिल्लीशी जोडणारा मुंबई बडोदा या महामार्गामुळे पनवेल नगरीचे अर्थकारण बदलणार आहे. पुढील 9 महिन्यात या रस्त्याचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे. सूमारे सव्वा चार किलोमीटर अंतरावर दुहेरी बोगद्याचे काम 60 टक्के पुर्ण झाले आहे.

तसेच हा महामार्गाचे शेवटच्या पॅकेज क्रमांक 17 चे सरासरी 45 टक्के काम पुर्ण झाले आहे. यासाठी 1400 कोटी रुपये खर्च केला जात आहे. पावसाळा संपल्यावर पुन्हा एकदा कामाने गती पकडली आहे. दुहेरी बोगदा आरपार करण्याचे काम ठरविलेल्या मुदतीपेक्षा अगोदर पुर्ण झाल्याने प्राधिकरणाच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. पॅकेज 17 हा 9.6 किलोमीटर अंतराचा असून बदलापूरच्या भोज गावापासून ते पनवेलमधील मोरबे गावापर्यंत हा रस्ता बांधला जाणार आहे. यामध्ये 4.39 किलोमीटरचे दुहेरी भोगदे माथेरान डोंगररांगांखालून खोदले आहेत. 13 मीटर उंच आणि 23 मीटर रुंदीच्या या दुहेरी बोगद्यात 8 वेगवेगळ्या मार्गिका असतील. विरार अलिबागचे भूसंपादनच रखडलेले बडोदा मुंबई महामार्गाचे पॅकेज क्रमांक 17 चे बांधकाम पुढील 9 महिन्यात पुर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सूरु आहेत. मात्र या पॅकेजनंतर हा महामार्ग विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला पनवेलच्या मोरबे गावाजवळ जोडला जाणार आहे. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी निधीची अडचण निर्माण झाल्याने या महामार्गासाठी भूसंपादनाचा मोबदला एमएसआरडीसी पनवेलच्या शेतक-यांना देऊ शकली नाही.

त्यामुळे भूसंपादनच रखडल्याने विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे बांधकामाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मोरबे ते कोन गावापर्यंत हे काम एमएसआरडीसी करण्याचे नियोजित होते. त्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. एमएसआरडीसीने मोरबे गावातील अनेक शेतक-यांना नूकसान भरपाईची रक्कम दिली. मात्र मोरबे गावानंतर अनेक गावांचे भूसंपादन रखडल्याने या बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामाचा श्रीगणेशा होऊ शकला नाही. कर्ज मिळाल्यानंतर निधी उपलब्ध झाल्यानंतरच एमएसआरडीसी या मार्गाचे काम हाती घेऊ शकेल. सध्या तरी येथे युद्ध पातळीवर काम सुरू असल्याने हा महामार्ग वेळेत पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
