4kNews कामोठे दि. 1
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मन्सूर पटेल यांच्यावर जबाबदारी
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, पनवेल तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते मन्सूर पटेल यांची ठाणे व नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मन्सूर पटेल यांचे अभिनंदन केले तसेच पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रीस मुलतानी आणि प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये मन्सूर पटेल यांच्यावर ठाणे व नवी मुंबई विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील अल्पसंख्याक मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार आहे.

समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची विकासाभिमुख भूमिका आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मन्सूर पटेल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मन्सूर पटेल हे पनवेल तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रियपणे कार्यरत असून, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आणि पक्षाची भूमिका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून ठाणे व नवी मुंबई विभागातील अल्पसंख्याक समाजातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, पक्ष संघटनेचा विस्तार करणे,

नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांची आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मन्सूर पटेल यांनी सांगितले. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवून महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी ठाणे व नवी मुंबई विभागात अल्पसंख्याक मोर्चाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. पक्षाची विचारधारा, विकासाची भूमिका आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास मन्सूर पटेल यांनी व्यक्त केला.

