4kNews
पनवेल (प्रतिनिधी) भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते व कवीहृदय व्यक्तिमत्त्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जतचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, नेरल मंडल अध्यक्ष नरेश मसणे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, कामगारनेते रविंद्र नाईक, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.

आदरांजली वाहताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय लोकशाही अधिक बळकट केली. संवाद व सहमतीचा मार्ग त्यांनी नेहमी स्वीकारला. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुवर्ण चतुर्भुज महामार्ग योजना, पोखरण अणुचाचणी, ग्रामसडक योजना तसेच परराष्ट्र धोरणातील धाडसी व दूरदृष्टीपूर्ण निर्णय आजही स्मरणात राहणारे आहेत. राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी असते, हा संदेश त्यांनी आपल्या आचारातून दिला. कवी म्हणून त्यांनी लिहिलेल्या कविता समाजाला संवेदनशीलता व राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या ठरल्या. अटलजींच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केले.

