4k News कामोठे
पनवेल दि.23 वार्ताहर): बळीराज सेना या राजकीय पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा दादर येथील देवराज हॉल येथे अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम बळीराज सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दादा वालम यांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर दिपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचा दानशूर राजा बळीराजा यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बळीराज सेना पक्षाचे दिवंगत नेते निसर्गवासी नंदकुमार मोहिते आणि निसर्गवासी कृष्णा कोबनाक यांना पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

अध्यक्ष तसेच मान्यवरांचा सत्कार करुन, डिजिटल मिडीया प्रमुख दिनेश हरड व त्यांच्या टिमने तयार केलेलं पक्ष संघटन आणि कार्यकर्ता सक्षमीकरण यांचे प्रेझेंटेंशन अॅड. विनेश वालम यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. प्रेझेंटेशनमध्ये बळीराज सेना पक्षाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आणि पुढील राजकीय यशस्वी वाटचालीसाठी तयार केलेला रोडमॅप दाखविण्यात आला. भविष्यकाळात आपल्या पक्षाने कोणती कार्ये केली पाहिजेत यांचे नियोजन सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.
त्यानंतर बळीराज सेनेचे कार्यकर्ते असलेले विविध विभागातील पदाधिकारी शहापूरचे मा. श्री. दशरथ भोईर, अंधेरीचे मा.श्री. संतोष चव्हाण, नाणार रिफायनरी विरोधक मा. सौ. मानसी धनावडे यांनी आपले अनुभव सर्वांसमोर कथन केले.

बळीराज सेना महाराष्ट्र राज्य संघटक डॉ. प्रकाश भांगरथ यांनी आपल्या भाषणामध्ये संबोधतांना शामराव पेजे आर्थिक विकास वित्त महामंडळामध्ये प्रत्येक जिल्हयासाठी कर्जाव्दारे व्यवसाय निर्मिती करण्यासाठी विशेष राखीव निधी ठेवण्यात आला आहे त्यांचा जास्तीत जास्त फायदा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी घ्यावा असे सांगितले आणि त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल सर्व सभागृहासमोर सादर केला. कृषी तज्ञ, जेष्ठ कृषी सल्लागार, ४० वर्षाचा कृषी क्षेत्राचा अनुभव असलेले आणि बळीराज सेनेचे निवडणूक, सहकार, कृषी, उद्योग, व्यापार निर्यात, रोजगार-स्वयंरोजगार महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विनायकराव भुसारेपाटील यांनी आपल्या भाषणात सांगताना, प्रत्येक तालुक्यात एक तरी कृषी केंद्र असावे, कृषी मालासाठी शासनाने जागा उपलब्ध करुन देणे, विविध स्वयंरोजगार उपलब्ध करुन तरुण व्यावसायिकांना कृषी क्षेत्रात उतरण्यासाठी आवाहन करण्याचे आश्वासन दिले. बळीराज सेना उपाध्यक्ष तथा कोकण बचावासाठी नेहमीच आंदोलने, मोर्चा काढणारे जेष्ठ राजकीय नेते सुरेश भायजे यांनी आपले राजकीय अनुभव सर्व कार्यकर्त्यांना सांगून आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलने मोर्चा का काढली पाहिजेत याचे स्पष्टीकरण दिले.

बळीराज सेना सरचिटणीस प्रकाश तरळ यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, येणाऱ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून २०२९ ची निवडणूक ही आपल्यासाठी कशी फायदेशीर आहे, त्याचा अभ्यास करुन कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणांत बोलतांना अशोकदादा वालमसाहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम छोटे-मोठे व्यवसाय सुरु करुन आपल्या पोटाचा प्रश्न सोडवावा आणि नंतरच राजकारणात यावे, बळीराज सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांना विविध व्यवसाय सुरु करुन देण्यासाठी लवकरच दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात येणार असून त्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, भाषण कौशल्य, कार्यकर्ता जोडणे, व्यवसाय प्रशिक्षण शिबीर, ज्यांना खरोखरच व्यवसाय करावयाचा आहे त्यांनीच या शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन केले. राजकारणात असतांना सरकारविरोधात आवाज उठवितांना फक्त पत्र व्यवहार न करता आंदोलनेव्दारे तसेच मोर्चा काढून कसे त्यांना वेठीस आणू शकतो यांची उदाहरणे देत ८३ नंबरमध्ये कुणबी जात समाविष्ट करण्यासाठी कसे आंदोलन केले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देवून मुंबईतील चाकरमानीला ‘कोकणवासी’ संबोधण्यासाठी सरकारी परिपत्रक काढले, गेली १८ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्वरीत चालू करुन २२ कोटीचा निधी उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते उपलब्ध करुन दिला.

आशा वर्कस, अंगणवाडी सेविका यांना न्याय मिळवून दिला. स्कूल व्हॅनचा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न शासनदरबारी चर्चा करुन मार्गी लावला, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी आपण सातत्याने लढा देत आहोत, हीच आपल्या कार्याची खरी ओळख आहे. पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देवून अध्यक्षांनी सर्व कार्यकर्ते यांना २०२९ च्या निवडणूकीसाठी आतापासून तयारीला लागा असे आवाहन केले. पत्रकार शरद मोरे व डिजिटल मिडीया प्रमुख दिनेश हरड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच बळीराज सेना पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम सर्वोतोपरी यशस्वी करण्यासाठी युवा नेतृत्व अॅड. विनेश वालम यांच्या कुशल नेतृत्वाखाली मनोहर पवार, मनोहर डोंगरे, विजय मांडवकर, अनिल मोंडे, संतोष टक्के आणि सहकारी यांनी बहुमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पक्षाचे सरचिटणीस मा. श्री. संभाजी काजरेकर यांनी यशस्वीरित्या सर्व कार्यक्रमाची रुपरेषा मुद्देसुद मांडून वेळेचे नियोजन करुन पार पाडले. तसेच कार्यक्रमाची सांगता बळीराज सेना युवती अध्यक्षा मा. सौ. स्वरा चोगले यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थितीतांचे आणि मान्यवरांचे, कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे शतशः आभार मांडले.

