4k समाचार
पनवेल, दि.17 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

नवीन पनवेल येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन’ आयोजित करण्यात आले होते. साहित्यसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख, नवीन पनवेल शाखाध्यक्ष गणेश कोळी, पनवेल शाखाध्यक्ष सुभाष कुडके, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी उपमहापौर चारुशीला घरत या मान्यवरांच्या उपस्थितीत संजय कदम यांच्या कार्याची प्रशंसनीय दखल घेण्यात आली.

सत्कार स्वीकारताना संजय कदम यांनी शासनाकडून मिळालेल्या या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या उपक्रमांत उत्साहाने सहभाग देण्याची ग्वाही दिली.
सोहळ्याच्या शेवटी कविसंमेलनाने उपस्थितांना साहित्यिक रंगात रंगवले आणि कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

