नवीन बातम्या
उत्तर रायगड जिल्हा भाजप कार्यकारणीची मासिक बैठक संपन्न
कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी प्रभाकर जोशी दाम्पत्याचा इस्कॉनतर्फे सन्मान
आमदार प्रशांत ठाकूर यांची महावितरण कार्यालयात धडक
खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत व्यक्त केली नाराजी
बदलत्या काळातील पालकत्व”  या विषयावर बालरोग संघटनेतर्फे पालक शिक्षकांकरिता विशेष चर्चा सत्र
*वेदनामुक्त आयुष्याचा नवा प्रवास; मेडिकव्हरच्या ‘मुव्हमेंटम २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*
धरणा गावातील गटारपाण्याच्या समस्येवर माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने तातडीने उपाययोजना
हंगरफ्रीवर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश
केडिऐजीबी ग्रुप आणि ओरायन मॉलच्या रक्तदान शिबीराला ऊदंड प्रतिसाद; २०५ पनवेलकरांनी केले रक्तदान
जलजीवन’ फेल ठरल्यानंतर सरपंचांच्या संकल्पनेतून चिंचवाडीचा पाणीप्रश्न सुटणार; माथेरानच्या कपारीत शोधला पाण्याचा स्त्रोत

पनवेलमध्ये ‘खुशरंग’ संगीत महोत्सव दिमाखात संपन्न; रसिक मंत्रमुग्ध 


4kNews दि. 10
पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘खुशरंग’ संगीत महोत्सव शेकडो संगीत रसिकांच्या साक्षीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या दिमाखात पार पडला. मार्केट यार्ड येथील सभागृहात सायंकाळपासूनच रसिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. शास्त्रीय गायन, भजन आणि कथक नृत्य यांचा सुरेल संगम अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी नामवंत कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून सभागृहात सुरांची मैफल रंगवली. प्रत्येक कलाविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.



श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या महोत्सवाचा शुभारंभ पं. गिरीश संझगिरी, ह.भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, पं.मारूती पाटील,पं. उमेश चौधरी, उस्ताद रफात खान नियाजी, नागनाथ पाटील व विनोद तोडेकर यांच्या हस्ते दीप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. महोत्सवात पहिले पुष्प पं. गिरीश संझगिरी यांनी गुंफले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग ‘पुरिया धनाश्री’ मधील ‘अब तो ऋतु मान’ हा बडा खयाल तर तीन तालात ‘बीत गये जुगवा पिहरवा’ हा छोटा खयाल सादर केला. त्यानंतर “ज्ञानीयांचा राजा”या अभंगाने आपल्या गायनाची सांगता केली. कार्यक्रमाचे दुसरे पुष्प पं. महेश कुलकर्णी यांनी गायनाची सुरुवात राग ‘श्री कल्याण’ मधील ‘अजहून आये’ बडा खयाल तर छोटा खयाल ‘झननन बाजे पायलीयां’ सादर केला. 

त्यानंतर राग सोहनी मधील छोटा खयालाने आपल्या गायनाची सांगता केली. कार्यक्रमाचे तिसरे पुष्प पं. विनायक नाईक यांच्या संकल्पनेतून साकार केला. गायन, वादन,नृत्य एक अविष्कार हा कार्यक्रम आर्या महाजन, ऋतुजा कुलकर्णी यांचे नृत्य आणि या नृत्याबरोबर विनायक नाईक व सहकाऱ्यांनी तीन तालामध्ये कायदे, तुकडे, रेळे यांचे वादन व जुगलबंदी सादर झाली.  कार्यक्रमाचा समारोपही अत्यंत भारदस्त वातावरणात झाला. उस्ताद अस्लम खान यांचे शिष्य पं. उमेश चौधरी यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात ‘बिहाग’ रागातील ‘श्रीराम श्रीराम जय जय राम’ या बडा खयाल ने तर ‘अब तो रट लागी’या छोट्या खयालाने केली.त्यानंतर खमाज रागामध्ये ठुमरी तसेच ‘केतकी गुलाब जुही चंपक बन फुली’ आणि शेवटी ‘वैकुंठीच्या राया’ या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांच्या दाणेदार, प्रभावी आवाजाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. 



सदर कलाकारांना संवादिनी साथ पं. विनायक ललित, स्मिता मनोहर तर तबलासाथ विनायक नाईक, प्रसाद सुतार, महेश कानोळे तर पखवाज सोमदत्त माने व सूरज गोंधळी तसेच नृत्याबरोबर गायन साथ तनुश्री जोग व सुधींद्र बागल यांनी दिली तर सूत्रसंचालन सोपान आढाव यांनी केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी कलाकारांसह महोत्सवाचे निमंत्रक ह.भ.प. वसंत पाटील, विनोद तोडेकर, अक्षय चौधरी, अनिल कोळी ,जगदीश म्हात्रे,मच्छींद्र पाटील आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या सुरेल मैफलीमुळे पनवेलकर संगीतप्रेमींना अविस्मरणीय असा सांस्कृतिक सोहळा अनुभवता आला. आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व कलाकार, सहवादक आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top