4kNews कामोठे दि 5
पनवेल(प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १४ च्या वतीने धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून संपन्न झाला. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.


केंद्र सरकारच्या “एक झाड आईच्या नावाने” या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे नागरिकांना मोफत वितरित करण्यात आली. तसेच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. केवळ झाडे लावणे नव्हे तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि हरित भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका सारिका भगत, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष सतीश पाटील, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष कृणाल पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धाकटा खांदा गावातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला. “आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली, आरोग्यदायी वातावरण आणि सुरक्षित भविष्य देऊ शकते,” असा संदेश देत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरण जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरला असून भविष्यातही अशा लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

