4kNews कामोठे दि. 8
पनवेल (प्रतिनिधी) हल्ली झालेले शहरीकरण, औद्योगीकरण, जीवघेणी स्पर्धा, समाज माध्यमांचा किशोरवयीन मुलांवर होणारा वाढता प्रभाव, त्याचे मुलांवर होणारे गंभीर दुष्परिणाम, मुलांमधील वाढलेली व्यसनाधीनता, वाढलेल्या वर्तन समस्या व हिंसाचार यामुळे पालक वर्ग थोडासा भांबावलेला आहे. या समस्या लक्षात घेऊन रायगड बालरोग संघटनेमार्फत “बदलत्या काळातील पालकत्व” या ज्वलंत, जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयावर शनिवार दि. 13 जून 2026 या दिवशी स. 11 ते 1 या दरम्यान एक विशेष परिसंवाद व चर्चासत्र आयोजित केले असून हे चर्चासत्र आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे.

या चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध बालरोग तज्ञ, संवादक, वक्ते व लेखक डॉ. अमोल अन्नदाते करणार असून यात डॉ निशिकांत कोतवाल (नागपूर), डॉ. जयंत पांढरीकर (अमरावती) डॉ चंद्रशेखर दाभाडकर (महाड) डॉ सुचित तांबोळी (अहिल्यानगर) व डॉ. नीलिमा भांडारकर (पनवेल) हे या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादानंतर ते शंका समाधान ही करणार आहेत. या चर्चासत्रात सर्व पालक व शिक्षकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अधिवेशनाच्या मुख्य संयोजिका डॉ. चित्रा कुलकर्णी व या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. जय भांडारकर (88501 53158) यांनी केले आहे.

