4kNews. कामोठे दि 12
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, उत्तर रायगडच्या वतीने ‘विभाजन विभीषिका दिना’निमित्त ज्येष्ठ पत्रकार व माध्यम सल्लागार डॉ. उदय निरगुडकर यांच्या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नेमकं काय घडलं! १९४७ ची फाळणी आणि सध्याची वैचारिक फाळणी’ या विषयावर इतिहास, वर्तमान आणि बदलत्या वैचारिक प्रवाहांचा वेध घेणारा हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता विरुपाक्ष मंगल कार्यालय, अशोक बागेसमोर, पनवेल येथे होणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील १९४७ची फाळणी हा अत्यंत वेदनादायी आणि निर्णायक अध्याय आहे. फाळणीच्या काळात नेमक्या कोणत्या घटना घडल्या, त्यामागील सामाजिक व राजकीय परिस्थिती काय होती, त्याचे देशावर झालेले दूरगामी परिणाम तसेच आजच्या काळातील बदलते वैचारिक प्रवाह याबाबत डॉ. उदय निरगुडकर आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून संवाद साधणार आहेत..

‘१९४७ ची फाळणी आणि सध्याची वैचारिक फाळणी’ या विषयाच्या माध्यमातून इतिहासाकडे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याबरोबरच वर्तमानातील वैचारिक घडामोडी समजून घेण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. विशेषतः युवा पिढीने इतिहास समजून घेताना त्यातील विविध पैलूंचा अभ्यास करणे आवश्यक असून, या संवादातून त्यांना विचारांना नवी दिशा आणि दृष्टिकोनाला नवी प्रगल्भता मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या विशेष कार्यक्रमाला पत्रकार, माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, युवा तसेच इतिहास आणि सामाजिक-राजकीय विषयांमध्ये रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप उत्तर रायगडच्या वतीने करण्यात आले आहे..

