4kNews कामोठे
मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) : अजित मोहिते जल जीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची थकीत देयके तातडीने अदा करावीत, रेट्रोफिटिंग योजनांसाठी निधी मंजूर करून वितरित करावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने आझाद मैदान, मुंबई येथे २४ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अनेक कंत्राटदारांची कामांची देयके प्रलंबित आहेत. निधी वितरणासाठी शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही झालेली नाही. १० जुलै २०२६ रोजी रेट्रोफिटिंग व सुधारित योजनांसाठी निधीबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला; मात्र त्यानुसार अद्याप अपेक्षित निधी वितरित झालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

यापूर्वी १२ ऑगस्ट रोजी नागपूर येथील संविधान चौकात कंत्राटदारांनी अर्धनग्न आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघटनेने रेट्रोफिटिंग कामांसाठी प्रस्तावित १० हजार कोटी रुपयांपैकी किमान ५ हजार कोटी रुपये तात्पुरते मंजूर करून तातडीने वितरित करावेत, निधी वितरणासाठी जाचक अटी दूर करून पीएफएमएसद्वारे निधी द्यावा, प्रलंबित सुधारित मंजुरीच्या कामांना जिल्हास्तरावर मंजुरी द्यावी तसेच सुरक्षा ठेव व अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली आहे.
थकीत देयकांमुळे कंत्राटदार, अभियंते, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले असून, शासनाने मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे..

