4kNews दि. 29 कामोठे
पनवेल | प्रतिनिधी
नोंदणी व मुद्रांक विभागात तब्बल ३३ वर्षे प्रामाणिक, पारदर्शक आणि जनाभिमुख सेवा बजावणारे सह दुय्यम निबंधक (सब-रजिस्ट्रार) नामदेव कलावती मधुकरराव पाटील हे ३१ जुलै २०२६ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करताना कार्यक्षम, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख अधिकारी अशी वेगळी ओळख निर्माण केली.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील महापुर हे मूळ गाव असलेल्या नामदेव पाटील यांचा जन्म ६ जुलै १९६८ रोजी झाला. वडील प्राथमिक शिक्षक असल्याने अतिशय दुर्गम भागात त्यांचे बालपण गेले. कठीण आर्थिक परिस्थितीत, अनेक किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वस्तीगृहात राहून उच्च शिक्षण घेत त्यांनी एम.कॉम. आणि बी.पी.एड. पदवी संपादन केली.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवत १९९३ मध्ये नोंदणी विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांच्या शासकीय सेवेला सुरुवात झाली. त्यानंतर धाराशिव, जळगाव, नाशिक, नंदुरबार, पुणे आणि कोकण विभागातील विविध कार्यालयांमध्ये त्यांनी जबाबदारीने काम केले. पदोन्नती मिळवत ते दुय्यम निबंधक श्रेणी-१ झाले आणि अखेर पनवेल क्र. ४ येथे सह दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत होते.

सेवाकाळात त्यांनी दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर दिला. दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य मार्गदर्शन, आपुलकीची वागणूक आणि तातडीची सेवा देणे, ही त्यांच्या कार्यशैलीची खास ओळख ठरली. कार्यालयीन शिस्त, स्वच्छता, अभिलेखांचे जतन आणि महसूलवाढीसाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.
बँकांच्या जप्ती प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क वसुली, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि विविध संस्थांकडून थकीत मुद्रांक शुल्काची वसुली तसेच नाशिक सिडकोमधील हजारो प्रकरणे निकाली काढण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शासनाच्या महसूल वाढीसाठी त्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा राहिला.

सामाजिक बांधिलकी जपत महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत पनवेल येथे नोंदणी विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वही जपले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रांताधिकारी पनवेल यांच्या हस्ते त्यांना ‘आदर्श सब-रजिस्ट्रार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
सरळ स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे नामदेव पाटील यांनी अधिकारी म्हणूनच नव्हे, तर आदर्श लोकसेवक म्हणूनही जनमानसात स्थान मिळविले आहे.

सेवानिवृत्तीनंतरच्या त्यांच्या आयुष्यास निरोगी, आनंदी आणि यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नोंदणी विभागातील भावी पिढीतील अधिकाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

