4kNews कामोठे दि. 18
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या वतीने विभाजन विभीषिका दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम सल्लागार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी उपस्थितांशी आणि प्रामुख्याने तरुणांशी सखोल संवाद साधला. हा कार्यक्रम शुक्रवारी पनवेल येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात पार पडला.
‘नेमकं काय घडलं ! – १९४७’ची फाळणी आणि सध्याची वैचारिक फाळणी या मुख्य विषयावर आधारित या कार्यक्रमात देशाच्या इतिहासातील १९४७ च्याफाळणीच्या वेदनादायक आठवणींना उजाळा देण्यात आला.

तसेच आजच्याकाळातील वैचारिक फाळणीवर डॉक्टर उदय निरगुडकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत सविस्तर भाष्य केले. युवकांनी देशाचा इतिहास बारकाईने समजून घेतला पाहिजे आणि योग्य दृष्टिकोन अंगी बाळगून वैचारिक प्रगल्भता वाढवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. या वैचारिक मंथनाचा लाभघेण्यासाठी तरुण वर्ग आणि भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात मोठी गर्दी केली होती.

या सोहळ्यास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, नगरसेवक मनोज भुजबळ, सुमित झुंझारराव, प्रवीण पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, कुसुम पाटील, वर्षा ठाकूर, भाजपचे माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर उपाध्यक्ष केदार भगत, अमित ओझे, महिला मोर्चाच्या संध्या शारबिद्रे, माजी नगरसेविका प्रभाकर बहिरा, अभिषेक पटवर्धन आणि चिन्मय समेळ उपस्थित होते.
‘युवकांनी इतिहास समजून घेत वैचारिक प्रगल्भता वाढवावी’

आजच्या तरुण पिढीने देशाचा इतिहास बारकाईने समजून घेतला पाहिजे. इतिहासातील घटनांचा अभ्यास करून त्यातून योग्य बोध घेणे आणि वर्तमान परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन करून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही विचारांचा स्वीकार करताना त्यामागील तथ्ये तपासण्याची आणि चिकित्सकपणे विचार करण्याची सवय युवकांनी लावून घ्यावी, असे आवाहन डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.त्यांच्या ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीतील मांडणीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे संदर्भ, त्यामागील कारणमीमांसा आणि वर्तमानातील परिस्थितीशी त्यांचा असलेला संबंध त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केला. त्यामुळे उपस्थित तरुणांमध्ये विषयाबाबत उत्सुकता निर्माण झाली.

प्रश्नोत्तरातून रंगला वैचारिक संवाद
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित तरुण आणि कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. इतिहास, समाजव्यवस्था, विचारधारा, वर्तमानातील सामाजिक परिस्थिती आणि युवकांची भूमिका यासंदर्भातील प्रश्नांना डॉ. निरगुडकर यांनी समर्पक आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. प्रश्नोत्तराच्या या सत्रामुळे कार्यक्रमाला संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले.या वैचारिक मंथनाचा लाभ घेण्यासाठी तरुण वर्ग, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरूपाक्ष मंगल कार्यालयात मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता युवकांमध्ये इतिहास आणि समकालीन विषयांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचे दिसून आले.

