4kNews
उरण, दि. 15 (विठ्ठल ममताबादे) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागांव तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पिरवाड समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी येतात. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दगड जमा झाल्याने विसर्जन मार्गावर अडथळा निर्माण झाला होता.

ही अडचण लक्षात घेऊन नागांव-म्हातवली प्रकल्पग्रस्त अध्यक्ष तथा समाजसेवक वैभव यशवंत कडू यांच्याकडे नागरिकांनी मार्ग मोकळा करण्याची मागणी केली. नागरिकांची अडचण लक्षात घेत कडू यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वखर्चातून समुद्रकिनारी जाणारा विसर्जन मार्ग मोकळा करून दिला.

‘गावकऱ्यांची अडचण ही आपलीच अडचण’ या भावनेतून केलेल्या या उपक्रमामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे नागांव व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, वैभव कडू यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

