4kNews कामोठे
मुंबई, दि. 10 (अजित मोहिते) : भारताची आर्थिक वाढ, वाढता शहरीकरण, डिजिटल परिवर्तन आणि लोकसंख्यात्मक लाभामुळे बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) व गृहनिर्माण वित्त कंपन्यांसमोर (HFC) मोठ्या संधी आहेत. या क्षेत्राचा पुढील टप्प्यातील विकास तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून राहील, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) उपराज्यपाल एस. सी. मुर्मू यांनी सांगितले.

‘NBFCs, HFCs and the New Phase of Growth’ या विषयावर आयोजित ७व्या CII NBFC आणि HFC परिषदेत ते बोलत होते. भारताला विकसित, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मजबूत व वैविध्यपूर्ण कर्जव्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
NBFC क्षेत्र आर्थिक समावेशन, शेवटच्या घटकापर्यंत कर्जपुरवठा, क्षेत्रनिहाय तज्ज्ञता तसेच नाविन्यपूर्ण वित्तीय उत्पादनांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मुर्मू यांनी सांगितले. NBFC कर्जाचे प्रमाण नाममात्र GDPच्या सुमारे १६.७ टक्क्यांवर पोहोचले असून, अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या एकूण कर्जपुरवठ्यात त्यांचा वाटा सुमारे २७ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली.

मात्र, वाढीच्या प्रक्रियेत कर्जमंजुरीचे निकष, मालमत्तेची गुणवत्ता आणि ग्राहक संरक्षणाशी तडजोड होता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला. सुशासन, तरलता व्यवस्थापन, मालमत्ता गुणवत्ता व पतजोखीम, ग्राहक संरक्षण तसेच डिजिटल परिवर्तन आणि सायबर सुरक्षा या पाच बाबींना आगामी काळात विशेष महत्त्व राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानाचा वापर करताना संस्थात्मक जबाबदारी कमी होता कामा नये. ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण आणि सायबर सुरक्षा यामुळेच सार्वजनिक विश्वास टिकवता येईल, असेही मुर्मू यांनी सांगितले. RBIचे नियमन हे नवोपक्रम आणि आर्थिक स्थैर्य यांच्यात संतुलन साधणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CIIच्या राष्ट्रीय NBFC व HFC समितीचे अध्यक्ष अभिमन्यू मुंजाल यांनी जबाबदार आणि व्यापक कर्जवितरणावर भर दिला. तर उपाध्यक्ष उमेश रेवणकर यांनी ‘गुणवत्तेसह विस्तार’ आवश्यक असल्याचे सांगितले. राकेश सिंह यांनी बँका, NBFC, HFC, फिनटेक आणि तंत्रज्ञान संस्थांमधील सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली.

