पनवेल, (4kNews) ः परभणी जिल्ह्यात पोलिसी अत्याचारात शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी. आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. याला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रिपब्लिकन सेना ( आनंदराज आंबेडकर) यांच्या वतीने पनवेल मध्ये बंद पुकारण्यात आला. यामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सुभाष गायकवाड, पंचशिल शिरसाठ, जमील पठाण, सोहेब खत्रिका, आदनान अन्सारी आदींसह मोठ्या संख्येने भीम अनुयायी सामील होते व त्यांनी दुकानदार बांधवांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले असता त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले की, शासनाने आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करून गुन्हे मागे घ्यावेत, अमानुष मारहाण करणार्या पोलिसांवर, गावगुंडांवर कारवाई व्हावी तसेच शहिद सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुर्नवसन करावे आदी मागण्या त्यांनी पक्षाच्या वतीने शासन दरबारी करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी सत्ताधारी महायुती विरोधात निषेधाच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या.
