4k समाचार दि. 30
पनवेल ता. (बातमीदार)
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सायकलवरून वडगाव, फलटण (जि. सातारा) येथून निघालेला तरुण रंजीत जाधव अखेर मुंबईत दाखल झाला आहे. या प्रवासात कळंबोली येथे मुक्कामादरम्यान सकल मराठा समाज कळंबोलीचे अध्यक्ष रामदास शेवाळे व शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक यांनी त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, निलेश दिसले, महेश गोडसे सूर्यकांत, राहुल ढेंबरे, प्रेम गोडसे उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या चळवळीस दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपस्थितांनी रंजीतचे कौतुक केले.

फलटण तालुक्यातील वडगाव गावचा रहिवासी रंजीत जाधव याने सायकलवरून तब्बल 230 किमीचा प्रवास करत कळंबोलीपर्यंत मजल मारली. या प्रवासादरम्यान समाजातील अनेक ठिकाणी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागतही केले. रंजीत जाधव पहाटे मनोज जरांगे पाटील यांच्या वाहन ताफ्यासह मुंबईतील आझाद मैदान गाठणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत.

यावेळी बोलताना सकल मराठा समाज कळंबोलीचे अध्यक्ष रामदास शेवाळे म्हणाले, “रंजीत जाधव याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्याने दाखवलेले धैर्य आणि चिकाटी समाजातील तरुणांना स्फूर्ती देणारी ठरेल. आरक्षणाच्या प्रश्नावर उभे राहण्यासाठी आजची पिढी अशा पद्धतीने पुढे येत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.” मराठा आरक्षणाच्या चळवळीला दिलेला हा अनोखा पाठिंबा समाजाच्या लढ्यात उत्साह वाढवणारा ठरत असून, रंजीत जाधवचे नाव प्रेरणादायी युवा कार्यकर्त्यांमध्ये गणले जाईल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

