पनवेल दि. १३ (वार्ताहर) : मोरबे धरणाची पाईपलाइन पनवेलमधून जात असल्याने नवी मुंबई महापालिकेने पनवेलकरांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पनवेल महापालिकेच्या विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे; अन्यथा पाईपलाईनचा व्हॉल्व बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पनवेलमध्ये वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने पनवेलकरांना मदत म्हणून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज पनवेल येथील शेकाप मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदला विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, गट नेता केतन भगत, प्रकाश म्हात्रे, तुषार पाटील, माधुरी गोसावी, देवेंद्र मढवी, माधवराव पाटील, शंकर म्हात्रे आदी उपस्थित होते.

यासंदर्भात पनवेल महापालिकेच्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या भेटीत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली असून, दोन्ही शहरांतील नागरिकांच्या हिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, मोरबे धरणाची पाईपलाईन पनवेल परिसरातून जात असल्याने ती बंद करण्याचा इशारा दिल्याने या मुद्द्यावरून दोन्ही महापालिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

