उरण दि.५ (विठ्ठल ममताबादे )– राज्य सरकारने जाहीर केलेल्या जुलै ते डिसेंबर २०२५ कालावधीतील महागाई भत्त्यात (VDA) केवळ ₹ 0 (शून्य) रुपयांची वाढ केल्याच्या निर्णयाचा भारतीय मजदूर संघ (BMS) आणि त्याच्या संलग्न औद्योगिक संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.

हा निर्णय लाखो कामगारांवर अन्याय करणारा असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असंवेदनशील आणि अमानवी आहे. जीवनावश्यक वस्तू, घरभाडे आणि प्रवास यांचे दर वाढत असताना महागाई भत्त्यात वाढ न करणे म्हणजे किमान वेतन कायद्याच्या तत्वांनाच हरताळ फासणं होय त्यामुळेच या निर्णयाचा पुर्नलोकन करून कामगारांना न्याय द्यावा. अशी मागणी लेबर ऑफीस पुणे येथील निदर्शने च्या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण व सचिव सागर पवार यांनी केले आहे . या वेळी निवेदन कामगार उपायुक्त निखील वाळके यांनी स्वीकारत कामगार आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या कडे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले आहेत.

या वेळी शिष्ट मंडळात अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव सागर पवार, उमेश विश्वाद, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार अध्यक्ष निलेश खरात , बाळासाहेब पाटील, अंकुश राउत, आण्णा महाजन , काका गवारे , राम सुरवसे, अक्षय शिरोटे, श्रीमती निखीता दंडवते , निखील टेकवडे, सुमीत कांबळे आदी महाराष्ट्रातील पदाधिकारी व रायगड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
