कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.

कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या संख्येने दंड लावण्यात आले. या अवाजवी कारवाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर निघालं की भीती वाटते — कॅमेरा दिसला की काळजाचा ठोका चुकतो.
“सुरक्षिततेसाठी कॅमेरे लावा, पण आम्हाला गुन्हेगार ठरवू नका,” असं म्हणत आज कामोठ्याच्या रहिवाशांनी कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. अजय भोसले आणि ट्रॅफिक हवालदार पाटील साहेब यांची भेट घेतली. या भेटीत विस्तृत चर्चा करत नागरिकांना सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, नोकरदार वर्ग… सर्वसामान्यांच्या तोंडून आज एकच आवाज होता – “आम्ही कायद्याचे पालन करू, पण अन्यायकारक दंड नको!”
यावेळी वरिष्ठ निरीक्षक श्री. अजय भोसले यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिलं. त्यांनी सांगितलं की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून लावल्या जाणाऱ्या दंडामध्ये कामोठेतील स्थानिक नागरिकांना लवकरच सवलत देण्याचा विचार केला जाईल.
या ऐक्य आणि न्याय्य मागणीच्या लढ्यात सहभागी असलेले रहिवासी होते – श्री. सुनील करपे, अॅड. समाधान काशीद, श्री. सुरेश खरात, श्री. दत्तात्रय निकम, श्री. रंगनाथ कोरडे, श्री. बापू साळुंखे, श्री. तानाजी कोनुरे, श्री. निलेश चिकणे, श्री. तात्या घाडगे, श्री. तनवीर डफेदार, आणि श्री. रोहित तांबे उपस्थित होते.
कामोठ्याच्या रस्त्यावरचा हा लढा हेल्मेटविरुद्ध नाही, तर अन्यायाविरुद्ध आहे – प्रशासनाकडून न्याय मिळेल, या आशेवर आज सारे उभे होते.




