4kNews
पनवेल दि.13 (वार्ताहर): खारघर शहरातील नवी मुंबई महानगर पलिकेच्या परिवहन सेवेच्या इलेक्ट्रिक बस सेवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार ठप्प होत असल्याने नागरिकांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस वेळेवर चार्जिंग न झाल्यामुळे निर्धारित वेळापत्रकानुसार फेऱ्या चालवल्या जात नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्वरीत चार्जिंग स्टेशन चालु करण्याची मागणी केली आहे.

या विस्कळीत व्यवस्थेमुळे शाळा–कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आणि नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळेत बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी उशिरा शाळेत पोहोचण्याच्या घटना वाढल्या आहेत तर नोकरीसाठी प्रवास करणाऱ्यांना पर्यायी प्रवास साधनांचा वापर करावा लागत आहे. याशिवाय, वेळेअभावी वयोवृद्ध नागरिकांना बस थांब्यावर दीर्घकाळ ताटकळत बसावे लागत आहे, ही बाब नागरिकांच्या भावनांना चटका लावणारी ठरत आहे. खारघर हे वेगाने विस्तारत असलेले आणि नियोजनबद्ध शहर असून येथे सार्वजनिक वाहतूक ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. इलेक्ट्रिक बस सेवा आधुनिक, पर्यावरणपूरक आणि वेगवान वाहतूक सुविधा म्हणून अपेक्षित असताना पुरेशा क्षमतेच्या चार्जिंग सुविधांचा अभाव ही गंभीर समस्या ठरत आहे. अनेक बस पहिल्या फेरीनंतर चार्जिंगमुळे डेपोमध्येच थांबतात आणि सेवा ठप्प होते, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खारघर उपशहर प्रमुख नंदु वारुंगसे यांनी परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात वारुंगसे यांनी खारघर शहरात आधुनिक आणि स्वतंत्र एनएमएमटी बस चार्जिंग स्टेशन तात्काळ उभारण्याची मागणी केली आहे. या संदर्भात वारुंगसे म्हणाले की, “खारघरमधील नागरिकांना बससेवेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बस चार्जिंग सुविधांचा अभाव हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे. चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी तात्काळ निर्णय घेतल्यास बस सेवा नियमित होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.” सध्या एनएमएमटी प्रशासनाकडे ही मागणी औपचारिकरित्या पोहोचली असून बस चार्जिंग स्टेशन उभारणीसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.खारघरमध्ये वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता बस सेवा सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिक, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

